Wednesday, 8 July 2026

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला बळ; तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

 




 

गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ देत महसूल प्रशासनाने तत्परतेने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले. अहेरी तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते बुधवारी (८ जुलै) शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम ही एकेकाळी नक्षल चळवळीतील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य म्हणून कार्यरत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्का यांनी १ जानेवारी २०२५ रोजी, तर त्यांचे पती सोनू उर्फ भूपती यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता. शासनाच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शिधापत्रिका मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

0000

देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना नियमानुसार परवानगी; ३०० कोटींच्या महसूल बुडविल्याचा आरोप निराधार रेती घाटांबाबत प्रसिद्ध वृत्तावर प्रशासनाचा खुलासा परवानग्या नियमानुसार; पावसाळ्यात १० जून ते ३० सप्टेंबर रेती उत्खननास बंदी

 


 

गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार व विहित प्रक्रियेचे पालन करूनच परवानगी देण्यात आली असून माध्यमातून प्रसिद्ध ३०० कोटीचा महसूल बुडविल्याचा आरोप निराधार असल्याचा खुलासा उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी दिला आहे.

देसाईगंज उपविभागातील रेती घाटांच्या कामकाजाबाबत झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार पर्यावरण मंजुरी प्राप्त रेती घाटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सर्वाधिक बोली लावणाऱ्या संस्थेस १३ रेती घाटांचा उपसा करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, संबंधित आदेशात नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

देसाईगंज उपविभागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्या संयुक्त पथकांमार्फत सातत्याने तपासणी केली जात आहे. तसेच अवैध उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार १० जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाळी बंदीचा असल्याने या कालावधीत रेती उत्खननास परवानगी नसते. त्यामुळे संबंधित रेती घाटांचे ताबे १० जून २०२६ रोजी प्रशासनाने परत घेतले असून, त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांकडून घाटांची नियमित पाहणी व तपासणी केली जात आहे. त्यामुळे घाटधारकांनी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन करून शासनाचा ३०० कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

0000

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे गडचिरोलीत जिल्हास्तरीय कार्यालय सुरू इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा; अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन

 


 

गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज आता गडचिरोली येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाने इतर मागासवर्गीय समाजातील विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळासह विविध समाजघटकांसाठी १३ उपमहामंडळांची स्थापना केली आहे. यामध्ये लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज), आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत समाज), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज) तसेच संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज) यांचा समावेश आहे.

महामंडळामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी विविध स्वयंरोजगार व आर्थिक विकासाभिमुख अशा सहा महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये रु. १ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, २० टक्के बीज भांडवल योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे. या सर्व योजना पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.

पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रियेसंदर्भात किंवा योजनांबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय मागे, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०७१३२-२२३०२४ वर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील पात्र युवक, महिला, स्वयंरोजगार इच्छुक तसेच उद्योजकांनी शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. के. के. सातपुते यांनी केले आहे.

0000

 

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराला यश; गडचिरोलीतील ६२ बालकांवर मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया गडचिरोलीत ३४६ बालकांच्या तपासणीनंतर ६२ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र; प्रवास, निवास, उपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च मोफत

 




 

गडचिरोली, दि.08 (जिमाका) :  गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त बालकांसाठी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या विशेष पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल हृदय तपासणी शिबिरात ३४६  बालकांची अत्याधुनिक 2D Echo तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२ बालकांवर लवकरच हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, आणखी १० बालकांची मुंबई येथे सविस्तर तपासणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा एकूण ६२ बालकांचा या उपक्रमात समावेश आहे.

या ६२ बालकांसाठी गडचिरोली ते मुंबई प्रवास, पालकांसह निवास व भोजन व्यवस्था, रुग्णालयातील उपचार, हृदय शस्त्रक्रिया तसेच आवश्यक वैद्यकीय सेवांचा संपूर्ण खर्च मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे.

गडचिरोलीतील गरजू बालकांना मुंबईतील अत्याधुनिक हृदयरोग उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी डॉ श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्य दूत फॉउंडेशन आणि संबंधित संस्थांशी सातत्याने समन्वय साधत या उपक्रमासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांना वेळेत मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत.

यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे कोणतेही बालक उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व ६२ बालकांना सुरक्षितपणे मुंबई येथे नेणे, त्यांच्या पालकांच्या राहण्याची व्यवस्था करणे, उपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलणे तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

गडचिरोलीत 346 बालकांची हृदय तपासणी करून त्यापैकी ६२ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम जिल्ह्यातील बाल आरोग्य सेवेला नवे बळ देणारा ठरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील हृदयविकारग्रस्त बालकांना अत्याधुनिक उपचारांची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.

0000

 

Tuesday, 7 July 2026

गडचिरोली शहरात १३ जुलैपासून 'अमृत आपल्या दारी परिवार सर्वेक्षण २०२६' आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या गरजा जाणून कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

 



 

गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग (AMRUT) – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने गडचिरोली शहरात दि. १३ जुलै २०२६ पासून 'अमृत आपल्या दारी परिवार सर्वेक्षण २०२६' हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊन त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

हे सर्वेक्षण विशेषतः अशा खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत विविध योजनांचा लाभ मर्यादित प्रमाणात मिळतो किंवा उपलब्ध होत नाही. अशा कुटुंबांच्या अडचणी, गरजा आणि जीवनमानाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून भविष्यात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यास या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान कुटुंबांची शैक्षणिक स्थिती, रोजगार, उत्पन्न, सामाजिक परिस्थिती, कौशल्य विकासाच्या गरजा, शासन योजनांबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन उपक्रम, रोजगाराभिमुख योजना तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले स्वयंसेवक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील. नागरिकांनी अचूक माहिती उपलब्ध करून देत सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणातून संकलित करण्यात येणारी माहिती केवळ जनहित आणि समाजहिताच्या उद्देशानेच वापरण्यात येणार असून नागरिकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

गडचिरोली शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वयंसेवकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विक्रम मोहन पांडे, जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली (अमृत) यांनी केले आहे.

00000

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन पावसाळा आला आरोग्य सांभाळा

 



गडचिरोली, दि. 7 (जिमाका) :  पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोलीतर्फे विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे म्हणाले की, "पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये, कारण साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास होते. तसेच, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि नेहमी ताजे व गरम अन्न खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे".

या मोहिमेच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत ताप अंगावर काढू नका. अनेकदा नागरिक घरगुती उपाय किंवा परस्पर औषधे (Self-medication) घेतात, जे धोकादायक ठरू शकते. सतत ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, उलट्या किंवा जुलाब होणे, सांधेदुखी किंवा तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास कोणताही उशीर न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा".

 ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश:

"पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या पाण्याचे ब्लिचिंग पावडर (TCL) वापरून नियमित व शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ग्रामसेवक आणि सरपंचांनी पाणी साठवणुकीच्या स्रोतांची नियमित स्वच्छता राखावी, तसेच पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी (OT Test) करूनच गावकऱ्यांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करावा, अशा कडक सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत."

 नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

 डासांपासून संरक्षण झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला आणि डास पळवून लावणारी क्रीम किंवा स्प्रेचा वापर करा.

 स्वच्छता: घराबाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. पावसाने भिजल्यास घरी आल्यावर अंघोळ करा. घरातील फरशी, भिंती, स्वयंपाकघर आणि शौचालय स्वच्छ ठेवा.

 पाणी शुद्धीकरण

पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात पिण्याचे पाणी नेहमी उकळून, गाळून आणि पूर्णपणे शुद्ध करून घेणे, हा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक जीवाणू व विषाणू नष्ट होतात, ज्यामुळे कॉलरा, टायफॉइड यांसारख्या गंभीर आजारांपासून प्रभावी संरक्षण मिळते. उकळलेले आणि शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरताना ते नेहमी स्वच्छ भांड्यात साठवून व्यवस्थित झाकून ठेवावे, जेणेकरून ते पुन्हा दूषित होणार नाही. शुद्ध आणि सुरक्षित पाणी पिणे हीच आरोग्यसंपन्न जीवनाची पहिली पायरी आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे

संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा आरोग्यविषयक मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा.

'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

सिरोंचा–आलापल्ली मार्गावर ३१ ऑक्टोबरपर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध

 


 

गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. मात्र, आपत्कालीन सेवा, प्रवासी बस, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

जड वाहनांनी सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली तसेच आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

0000