Tuesday, 7 July 2026

गडचिरोली शहरात १३ जुलैपासून 'अमृत आपल्या दारी परिवार सर्वेक्षण २०२६' आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या गरजा जाणून कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

 



 

गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग (AMRUT) – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने गडचिरोली शहरात दि. १३ जुलै २०२६ पासून 'अमृत आपल्या दारी परिवार सर्वेक्षण २०२६' हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊन त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

हे सर्वेक्षण विशेषतः अशा खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत विविध योजनांचा लाभ मर्यादित प्रमाणात मिळतो किंवा उपलब्ध होत नाही. अशा कुटुंबांच्या अडचणी, गरजा आणि जीवनमानाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून भविष्यात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यास या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान कुटुंबांची शैक्षणिक स्थिती, रोजगार, उत्पन्न, सामाजिक परिस्थिती, कौशल्य विकासाच्या गरजा, शासन योजनांबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन उपक्रम, रोजगाराभिमुख योजना तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले स्वयंसेवक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील. नागरिकांनी अचूक माहिती उपलब्ध करून देत सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणातून संकलित करण्यात येणारी माहिती केवळ जनहित आणि समाजहिताच्या उद्देशानेच वापरण्यात येणार असून नागरिकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

गडचिरोली शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वयंसेवकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विक्रम मोहन पांडे, जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली (अमृत) यांनी केले आहे.

00000

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन पावसाळा आला आरोग्य सांभाळा

 



गडचिरोली, दि. 7 (जिमाका) :  पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोलीतर्फे विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे म्हणाले की, "पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये, कारण साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास होते. तसेच, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि नेहमी ताजे व गरम अन्न खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे".

या मोहिमेच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत ताप अंगावर काढू नका. अनेकदा नागरिक घरगुती उपाय किंवा परस्पर औषधे (Self-medication) घेतात, जे धोकादायक ठरू शकते. सतत ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, उलट्या किंवा जुलाब होणे, सांधेदुखी किंवा तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास कोणताही उशीर न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा".

 ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश:

"पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या पाण्याचे ब्लिचिंग पावडर (TCL) वापरून नियमित व शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ग्रामसेवक आणि सरपंचांनी पाणी साठवणुकीच्या स्रोतांची नियमित स्वच्छता राखावी, तसेच पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी (OT Test) करूनच गावकऱ्यांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करावा, अशा कडक सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत."

 नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

 डासांपासून संरक्षण झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला आणि डास पळवून लावणारी क्रीम किंवा स्प्रेचा वापर करा.

 स्वच्छता: घराबाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. पावसाने भिजल्यास घरी आल्यावर अंघोळ करा. घरातील फरशी, भिंती, स्वयंपाकघर आणि शौचालय स्वच्छ ठेवा.

 पाणी शुद्धीकरण

पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात पिण्याचे पाणी नेहमी उकळून, गाळून आणि पूर्णपणे शुद्ध करून घेणे, हा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक जीवाणू व विषाणू नष्ट होतात, ज्यामुळे कॉलरा, टायफॉइड यांसारख्या गंभीर आजारांपासून प्रभावी संरक्षण मिळते. उकळलेले आणि शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरताना ते नेहमी स्वच्छ भांड्यात साठवून व्यवस्थित झाकून ठेवावे, जेणेकरून ते पुन्हा दूषित होणार नाही. शुद्ध आणि सुरक्षित पाणी पिणे हीच आरोग्यसंपन्न जीवनाची पहिली पायरी आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे

संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा आरोग्यविषयक मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा.

'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

सिरोंचा–आलापल्ली मार्गावर ३१ ऑक्टोबरपर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध

 


 

गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. मात्र, आपत्कालीन सेवा, प्रवासी बस, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

जड वाहनांनी सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली तसेच आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

0000

 

१० जुलै रोजी आरमोरी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 


गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित खाजगी कंपन्यांकडून सुमारे ५६० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १० वी, १२ वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या १८ ते ४० वर्षे वयोगटातील बेरोजगार उमेदवारांनी बायोडाटा व आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी gadchirolirojgar@gmail.com या ई-मेलवर किंवा ७८४३०४८२४९ व ८७८८२५७०१६ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

0000

जिल्हास्तरीय ६५ वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा मुलचेरा येथे १६ व १७ जुलैला

 


 

गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ६५ वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा सन २०२६-२७ चे आयोजन दि. १६ व १७ जुलै २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, मुलचेरा येथे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी उपस्थिती दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता राहील.

स्पर्धेत १५ वर्षांखालील (मुले) तसेच १७ वर्षांखालील (मुले व मुली) गटांचा समावेश असून, सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी व खेळाडूंनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्रवेश अर्ज दि. १४ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ऑफलाइन सादर करावेत.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी जन्मदाखला, पहिल्या इयत्तेतील जनरल रजिस्टरची सत्यप्रत, आधार कार्ड तसेच आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र (१४ वर्षांखालील खेळाडूंसाठी) सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक  (मो. ९५०३३३११३३) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

0000

Monday, 6 July 2026

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये भात व कापूस पिकांसाठी संधी; शेतकऱ्यांनी विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 


 

गडचिरोली, (जिमाका) दि. ६ : राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात व कापूस या अधिसूचित पिकांचा विमा उतरविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित महसूल मंडळात अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे निर्धारित उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास संबंधित पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात भात व कापूस या दोन पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के, तर कापूस या व्यापारी पिकासाठी ५ टक्के विमा हप्ता भरून शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात.

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल (NCIP) वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) किंवा स्वतः ऑनलाइन अर्ज भरूनही सहभाग नोंदविता येणार आहे. यासाठी ॲग्री-स्टॅक नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे.

विमा अर्जासाठी जमिनीची आवश्यक कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसेच आधारशी संलग्न बँक खाते आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे पूर्ण करणे अनिवार्य आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये नोंद झालेल्या पिकाची माहिती आणि विमा अर्जातील पिकाची माहिती यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील माहिती अंतिम मानली जाईल. अशा तफावतीमुळे विमा अर्ज नामंजूर होऊ शकतो.

योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी चुकीची माहिती देऊन अर्ज केल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विमा योजनेत सहभागी होण्यासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्राखाली पीक असणे आवश्यक आहे.

योजनेसंदर्भात कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय किंवा १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळविता येईल.

चालू वर्षातील संभाव्य हवामान बदल आणि पावसाबाबतच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षणाचे प्रभावी साधन ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाइन माध्यमातून ३१ जुलै २०२६ पूर्वी विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

00000

जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम ७ ते ९ जुलैदरम्यान गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज येथे कार्यक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 


 

गडचिरोली, (जिमाका) दि. ६ : जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी श्रीकृष्णा शालीकराम धोटे (प्रबोधनकार), श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, गाडगेनगर, अमरावती हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

- दि. ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता – पीएमश्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर,   

      गडचिरोली.

- दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता – नगर परिषद सभागृह, आरमोरी.

- दि. ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता – नगर परिषद सभागृह, देसाईगंज.

या प्रबोधन कार्यक्रमांमध्ये जादूटोणा व अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती, अंधश्रद्धेचे दुष्परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज, समाजात विवेकवादी विचारांचा प्रसार तसेच नागरिकांची कायदेशीर जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी या प्रबोधन कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000